जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाकडील २१ डिसेंबरच्या आदेशान्वये महानगरपालिका क्षेत्रात २२ डिसेंबर, २०२० ते ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी घोषित करण्यात आलेली आहे. त्यानुसार जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात पूर्णत: संचारबंदी घोषित करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपरिषद क्षेत्रात दिनांक ३१ डिसेंबर, २०२० रोजी रात्री ११.०० वाजेपासून सकाळी ६.०० वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या क्षेत्रातील व राष्ट्रीय महामार्गावरील सर्व हॉटेल्स/रेस्टॉरंट/ढाबे, दुकाने, बाजार रात्री १०.३० वाजेपर्यत सुरु राहतील, जेणेकरुन निर्बधीत कालावधीत नागरिकांची वर्दळ/गर्दी राहणार नाही. तसेच या क्षेत्रातील सिनेमागृह/नाट्यगृहे/सभागृह/मंगल कार्यालये/लॉन्स व तत्सम ठिकाणी रात्री १०.३० पर्यंत सुरु राहतील. या कालावधीत आयोजित करण्यात येणारे लग्न समारंभ, कार्यक्रम, स्पर्धा व इतर अनुषंगिक कार्यक्रम रात्री १० वाजेपूर्वी समाप्त करण्यात यावेत. तसेच कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (SOPs) नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील. तसेच महाराष्ट्र शासनाकडून लॉकडाऊन कालावधीत लागू केलेले निर्बंध शिथील करण्याबाबत वेळोवेळी दिलेले निर्देश पुढील आदेश होईपर्यंत लागू राहतील.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
















