जळगाव (प्रतिनिधी) दोघ मुलांसह भाच्याला घेवून घराकडे निघालेल्या आशासेविकेच्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार वत्सला उर्फ राणी सरदार चव्हाण (वय ३०) या महिलेसह सोमेश सरदार चव्हाण (वय २), सोहम सरदार चव्हाण (वय ७, सर्व रा. शिरसोली, ता. जळगाव) यादोघ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास शिरसोली ते रामदेववाडी दरम्यान घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी धडक देणाऱ्या कारसह अन्य एका कारची तोडफोड केली. त्यामुळे वाहतुक सुमारे चार तास ठप्प झाली होती.
भरधाव कारने दिली समोरून धडक !
जळगाव तालुक्यातील रामदेववाडी जळके येथील आशासेविकास वत्सला व उर्फ राणी चव्हाण या पती व दोन मुलांसह वासतव्यास होत्या. रामदेववाडी येथे त्यांचे माहेर असल्याने मंगळवारी सकाळच्या सुमारास त्या माहेरी गेल्या होत्या. दुपारी पाच वाजेच्या सुमारास त्या दोघ मुलांसह भाचा लक्ष्मण भास्कर राठोड यांना घेवून शिरसोली येथे घरी येण्यासाठी निघाल्या. गावापासून काही अंतरावर जाताच समोरुन भरधाव वेगाने पाचोऱ्याकडे जात असलेल्या (एमएच १९ सीव्ही ६७६७) क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली.
दुचाकी खड्ड्यात कोसळली, तर कार तारेचे कुंपण तोडून खडकावर आदळली !
हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली, तर कार थेट बाजूला असलेल्या तारेचे कुंपण तोडून खडकावर आदळली होती. या अपघातात दुचाकीस्वार वत्सला उर्फ राणी चव्हाण यांच्यासह त्यांचा दोन वर्षाचा सोमेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोठा मुलगा सोहम व भाचा लक्ष्मण राठोड हे दोघ गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर सोहम याचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला तर लक्ष्मण राठोड याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
तरुणांना घेण्यासाठी आलेल्या कारचा चुराडा !
धडक देणाऱ्या तरुणांना जमावाकडून मारहाण होत असल्याने त्यांना घेवून जाण्यासाठी (एमएच १९, सीजे ११७७) क्रमांकाची कार त्याठिकाणी आली. दोघे तरुण त्यामध्ये बसताच संतप्त झालेल्या जमावाने या वाहनात वृद्ध देखील बसले होते, जमावाने त्यावृद्धांना बाहेर काढीत कारची तोडफोड करीत चुराडा करुन टाकला होता.
साडेतीन तासानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल !
संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक होत असल्याने घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह आरसीपी प्लाटून आणि बीएसफची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. परंतु नातेवाईक मृतदेहाला हात लावू देत नव्हते. त्यांनी दोन वेळा पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर साडेआठ वाजेच्या सुमारास मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला.
वाहतूक विस्कळीत !
दोन्ही बाजूने दीड किमी पर्यंत वाहनांचे रांगा अपघातात दोघ चिमुकल्यांसह आईचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्तारोको केला होता. तसेच पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील सुमारे एक ते दीड किलो अंतरावर वाहने थांबविण्यात आली होती. हा वाद मिटल्यानंतर पोलिसांनी याठिकाणावरील वाहतुक सुरळीत केली.
कारमध्ये सापडल्या गांजाच्या पुड्या !
दुचाकीस्वारांना चिरडणाऱ्या वाहनात शहरातील राजकीय व्यक्तींसह शासकीय कंत्राटदार असलेल्यांचे मुले होती. तसेच अपघातानंतर कारची तपासणी केली असता त्यात गांजाच्या काही पुढ्या आढळून आल्या. त्यामुळे कारचालकासह इतरांनी नशा करून कार चालवल्याने हा अपघात झाल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला.
तिघांच्या मृत्यूने संसार उद्धवस्थ !
भरधाव कारने दिलेल्या धडकेत दोघ चिमुकल्यांसह आईचा दुर्देवी मृत्यू झाल्या. चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचा संसारच उद्धवस्थ झाला आहे. या तिघांचे मृतदेह बघताच त्यांच्या कुटुंबियांनी रस्त्यावरच मनहेलावणारा आक्रोश केला असून गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लाठीचार्ज करताच पोलिसांवर दगडफेक !
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, त्यांनी संतप्त झालेल्या जमावातून धडक देणाऱ्या तरुणांची सुटका करीत त्यांना एका वाहनातून शहराच्या दिशेने रवाना केले. याचवेळी क्युआरटीचे पथक याठिकाणी पोहचले. या पथकाने जमावावर लाठीचार्ज करताच, वातावर अधिकच चिघळले आणि संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये काही पोलिस किरकोळ जखमी झाले आहे.
संतप्त ग्रामस्थांनी धडक देणाऱ्या तरुणांना केली बेदम मारहाण !
भरधाव कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी धडक देणाऱ्या वाहनातील दोघांना बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. तसेच गावातील पोलीस पाटील याने धडक देणाऱ्या तरुणांची बाजू घेतल्याने ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले आणि त्यांनी धडक देणाऱ्या वाहनांची तोडफोड करीत नुकसान केले.