अमळनेर (प्रतिनिधी) अमरावती येथील विवाह सोहळ्यात आनंदाने सहभागी झालेल्या महिलेचा घरी परत आल्यानंतर उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रूपाली गजेंद्रसिंग राजपूत (३३), असे मयत महिलेचे नाव आहे.
रुपाली या अमरावती येथून विवाह सोहळा आटोपून गुरुवारी सायंकाळी रेल्वेने शहरात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना मळमळ व उलट्या होत असल्याने तांबेपुरा परिसरातील एका खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. उष्माघाताची लक्षणे असल्याने संबंधित डॉक्टरांनी औषधोपचार केले. नंतर त्यांना रात्रभर बरेही वाटले. मात्र, सकाळी पुन्हा मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाल्यावर पतीने गावातील अन्य खासगी डॉक्टरांकडे नेले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून रूपाली यांना मृत घोषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे यांनी शवविच्छेदन केले. त्यांचा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमकं कारण समजणार आहे. दरम्यान, दीपक राजपूत यांनी दिलेल्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.