कोल्हापूर (वृत्तसंस्था) गोव्याहून मुंबईला जाणारी खासगी ट्रॅव्हल गुरुवारी (दि. २३) पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर- राधानगरी मार्गावर पिरवाडी (ता. करवीर) गावच्या हद्दीत पुईखडी येथे उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नीलू विराट गौतम (वय ४६), रिद्धिमा विराट गौतम (१७) आणि सार्थक विराट गौतम (१३, तिघे मूळ रा. मांजरी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. झोपेत असतानाच काळाने तिघांवर घाला घातला.
या अपघातात जखमींमध्ये मनित संजय दरक (१७), प्रणव दत्तराज सावंत (१७), सचिन रवींद्र कदम (३७, तिघे रा. बोरिवली, मुंबई), आयुष्मान अमरकांत मिश्रा (१७, रा. दहिसर, मुंबई), विश्वनाथ मोनप्पा (४७, रा. मंगलोर, कर्नाटक) आणि चालक आनंद विठ्ठल चव्हाण (४०, रा. विजापूर, कर्नाटक) यांचा समावेश आहे.
मुंबईला जाणारी स्लीपर कोच बस बुधवारी रात्री ८ वाजता गोव्यातील पणजी येथून निघाली. गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास चालक निरंजनय्या बसय्या हिरेमठ याचे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव ट्रॅव्हल्स पलटली. या अपघातात गौतम यांची पत्नी नीलू आणि मुलगी रिद्धिमा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा सार्थक याचा रुग्णालयात नेतांना वाटेतच मृत्यू झाला. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. मात्र त्यातील दोघींचा जागीच मृत्यू झाला.
मांजरी बुद्रुक येथील गौतम कुटुंब गोव्याला पर्यटनासाठी गेले होते. परत जाताना काळाने त्यांच्यावर काळाने घाला घातला. आईसह मुलगा आणि मुलगी या तिघांचा अपघातात करुण अंत झाला. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेले विराट गौतम यांच्यावर त्यांची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह घेऊन गावाकडे परत जाण्याची दुर्देवी वेळ आली.