मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे एकनाथ खडसे यांनी आभार मानले आहे. यासंदर्भात ते माध्यमांना बोलत होते. तसेच भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. ज्या प्रकारे मला आधार राष्ट्रवादीने दिला तो माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याचंही खडसे म्हणाले.
राष्ट्रवादीने विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली असून ते आज अर्ज दाखल करणार आहेत. “विधानसभेच्या कालखंडात ज्या घटना घडल्या त्यामुळे मला भाजपातून राष्ट्रवादीमध्ये यावं लागलं असं ते बोलताना म्हणाले. मला भाजपने फक्त गाजर दाखवलं. सत्ता माझ्या दृष्टीकोनातून मोठी नाही. पण ज्या प्रकारे मला आधार राष्ट्रवादीने दिला तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. माझ्या पडत्या काळात माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्यांवर प्रामाणिक राहणं माझं कर्तव्य आहे.” असं खडसे म्हणाले आहेत.
भाजपने पंकजा मुडेंना तिकीट न देणं मोठी दुर्दैवी गोष्ट
“शरद पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. पण आज महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंचं योगदान मोठं आहे. मुंडे-महाजन-खडसे यांनी भाजप महाराष्ट्रात मोठी केली, पण भाजपने पंकजा मुंडे यांना तिकीट न देणं ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे, खेदजनक आहे, हे पंकजासाठी अन्याय आहे. ज्यांचं पक्षासाठी योगदान नाही ते पदावर बसतात हे खूप दुर्दैवी आहे. भाजपने पंकजा यांचा विचार करायला पाहिजे होता.” असं मत खडसे यांनी व्यक्त केलं आहे.
राज्यसभेसाठी सध्या घोडेबाजार सुरूये
राज्यसभेसाठी सध्या घोडेबाजार सुरू आहे. २३ वर्षामध्ये असं कधी झालं नव्हतं. इतके वर्षे सामंजस्याने प्रश्न सुटत होते पण सध्या पक्ष ज्या भूमिका घेतात ते लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही असं खडसे बोलताना म्हणाले.