मुंबई (वृत्तसंस्था) ”दारु निर्मात्यांसाठी निर्णय घेणारे हे ठाकरे सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे. आम्ही शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) म्हणाले होते. आता वीज कनेक्शन तोडले जात आहे, त्यामुळे अजित पवारांच्या शब्दाला आघाडी सरकारमध्ये किंमत राहिलेली नाही,” असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
बऱ्याच काळानंतर मोठं अधिवेशन मिळालं असल्याचा उल्लेख यावेळी फडणवीसांनी केला. “आम्हाला चर्चा करण्यात रस आहे. अनेक दिवसांनंतर १७-१८ दिवस चालणारं अधिवेशन आम्हाला मिळालं आहे. राज्याच्या जनतेचे प्रश्न तिथे मांडले गेले पाहिजेत. पण चर्चा झाली पाहिजे ही सरकारी पक्षाचीही जबाबदारी आहे. नाहीतर ओबीसीच्या मुद्द्यावर बोललं, तर १२ लोकांना निलंबित केलं. विद्यापीठाचं विधेयक विरोधकांची मुस्कटदाबी करून काढण्यात आलं. लोकशाही पायदळी तुडवली. असा व्यवहार हे सरकार करणार असेल, तर त्याचा आम्हालाही विचार करावा लागेल”, असं फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलताना फडणवीसांनी राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाल्याचं सांगितलं. “राज्यातला शेतकरी हवालदील झाला आहे. विजेचे कनेक्शन कापण्याचं काम सरकारने सुरू केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिलेली नाही. मागच्याच्या मागच्या अधिवेशनात त्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं, वीज कनेक्शन कापणं बंद, शेवटच्या दिवशी सांगितलं सुरू. मागच्या अधिवेशनात ते म्हणाले, तेव्हा मी चुकीचं बोललो होतो, आता ठामपणे सांगतोय की वीज कनेक्शन कापणार नाही. पण आता स्पर्धा लागल्यासारखे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत. गेली दोन वर्ष आस्मानी संकट आणि आता सुलतानी संकट शेतकऱ्याला झेलावं लागत आहे. यावर सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत”, असं फडणवीस म्हणाले.
















