लखनौ (वृत्तसंस्था) उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमधील ज्येष्ठ मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपच्या आठ आमदारांनी भाजपला धक्का दिला असून त्यांनी पक्षाचा राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. हे सर्व आमदार बिगर यादव मागास वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. ऐन निवडणूक काळात भाजपला बसलेला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
योगी सरकारमध्ये सेवायोजन मंत्री राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपचे आमदार रोशनलाल वर्मा, भगवती सागर, बृजेश प्रजापती, ममतेश शाक्य, विनय शाक्य, धर्मेंद्र शाक्य आणि नीरज मौर्य यांनी राजीनामा देत सपामध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे मागास वर्गाचा एक मोठा चेहरा आहेत. कधीकाळी ते कांशीराम यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात होते. २००७ ते २०१२ या काळात मायावती यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. नंतर बहुजन समाज पार्टी सोडून ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यांची मुलगी संघमित्रा मौर्य बदायूंमधून भाजपच्या खासदार आहेत. गत लोकसभा निवडणुकीत त्यांनी अखिलेश यादव यांचे चुलत बंधू धर्मेंद्र यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केले होते.
सपाकडे यादव आणि अल्पसंख्याक समाजाची मोठी वोट बँक आहे. यात जर मागास जाती आणि ब्राह्मण जोडले गेले तर त्यांना भाजपला हरविण्यात काहीही अडचण येणार नाही. त्यामुळेच अखिलेश यादव यांनी ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, संजय चौहान यांच्या जनवादी पार्टी, अपना दल (कृष्णा पटेल गट), केशवदेव मौर्य यांच्या महान दल, जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दलासोबत आणि आपले काका शिवपाल यादव यांच्या प्रगतिशील समाजवादी पार्टी (लोहिया) यांच्यासोबत आघाडी केली आहे.