अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय विवाहितेने तीन महिन्यापूर्वी आठ वर्षीय मुलीसह कळमसरे शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मारवड पोलिसात एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू या विवाहितेने मुलीसह आत्महत्या करण्यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे.
कळमसरे-नीम रस्त्यावरील सबस्टेशनजवळ भाकचंद जैन यांच्या शेतातील विहिरीत ४ ऑक्टोबर २०२२ रोजी नीम येथील विवाहितेने आठ वर्षीय मुलीसह आत्महत्या केली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी तीन महिन्यानंतर अशोक गटळू कोळी (रा.निम ता. अमळनेर) यांच्याविरुद्ध विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मयत विवाहीतेच्या पतीने यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्या पत्नीने अशोक कोळी यास कानातील ५ ग्रामची सोन्याची बाही दिली होती. ती बाही अशोकने परत केली नाही. तसेच पत्नीने अशोक याच्यासोबत शारीरीक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून अशोक हा त्याच्याकडे असलेले दोघांचे फोटो व व्हाईस रेकॉर्डिंग गावात पसरवून बदनामी करीन अशी वारंवार धमकी देत होता. या त्रासाला कंटाळून आपल्या पत्नीने मुलीसोबत आत्महत्या केली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. तीन महिन्यानंतर दि.८ जानेवारी २०२३ रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि बाळकृष्ण शिंदे हे करीत आहेत.