जळगाव (प्रतिनिधी) कोविड-१९ मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजीचा छात्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
यावर्षी शिवजयंती साजरी करताना संपुर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे जसे सार्वजनिक पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादीचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन न करता सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम फक्त १०० व्यक्तीच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्याठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
कोविड-१९च्या विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजुन काही सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.