लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने माणूसकीला काळिमा फासणारं कृत्य केलंय. त्याने कथितपणे आपल्या पत्नीवर उकळतं पाणी टाकलं. आरोपी आपल्या पत्नीवर नाराज होता कारण तिने मुलाला जन्म दिला नाही. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे.
या घटनेनंतर महिलेला लगेगच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उकळतं पाणी तिच्या शरीरावर पडल्याने अतिशय वाईटरित्या महिला जळाली असून तिची स्थिती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
शाहजहांपूर येथील एसपी संजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये पीडित महिलेचं लग्न झालं होतं. या महिलेला तीन मुली आहेत. सर्वात लहान मुलीचा जन्म एक वर्षापूर्वी झाला होता. मुलगा होत नसल्याने आरोपी सत्यपालचा पत्नीवर राग होता. महिलेला माहेरहून ५ लाख रुपये आणण्यासाठी दबावही आणत होता. तो पत्नीला नेहमी त्रास द्यायचा, तिला जेवणही दिलं जात नव्हतं.
पीडित महिलेच्या वडिलांनी त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात आयपीसी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.