नांदेड (वृत्तसंस्था) महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात सध्या भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ते मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी शुक्रवारी नांदेडमध्ये आले होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर बावचळल्यासारखे बोलत असल्याची टिप्पणीही अजित पवार यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजपच्या त्यांनी नेत्यांचा समाचार घेतला. भाजपमधील कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत, यासाठी सरकार पडेल असे गाजर दाखवण्याचे काम सुरु आहे. तरीदेखील एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे नेते आमच्याकडे आले, असे अजित पवार यांनी सांगितले. महाविकासआघाडी सरकार चालवताना काहीवेळा अडचणी येतात. पण थोडे मागे-पुढे करुन निर्णय घ्यावे लागतात. राज्याचे हित हेच आमचे समान धोरण आहे. आजवर महाराष्ट्र कधी दिल्लीश्वरांपुढे झुकला नाही, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. यावेळी अजित पवार यांनी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. माझ्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी असं कधी पाहिलं नव्हतं. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागावाटप केले. त्यामुळे आता व्यक्तिगत हेवेदावे करुन वातावरण गढूळ करु नका. आपल्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे हे कार्यकर्ता म्हणून आपले कर्तव्य असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.