मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रात भाजपचं सरकार आहे. या सरकारने देशातील एकता आणि आखंडतेला धक्का देण्याचं काम सुरू केलं आहे. लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु असून हे गंभीर आहे अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना अजित पवार बोलत होते. राज्यात आघाडीचं सरकार आल्यानंतर नैसर्गिक संकटं आली. या संकटाचा आपण सामना केला. यापुढेही आपल्याला आव्हानाचं रुपांतर संधीत करावं लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारने लोककल्याणाची कामं केली आहेत. ही कामे लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असं पवार म्हणाले.
केंद्रात भाजपचं सरकार आहे. या सरकारने देशातील एकता आणि आखंडतेला धक्का देण्याचं काम सुरू केलं आहे. लोकशाही संस्था मोडीत काढण्याचं काम सुरू केलं आहे. पत्रकारांपासून अनेक घटकांची मुस्कटदाबी सुरू आहे. लोकशाहीला झुंडशाहीचं स्वरुप देण्याचं काम सुरू आहे. संविधान वाचवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. अशावेळी लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे, असं ते म्हणाले.
कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावरही त्याचा परिणा झाला आहे, असं ते म्हणाले. भाजपचं केंद्रात सरकार आल्यापासून देशात महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेलपासून ते स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे, असं त्यांनी सांगितलं.