जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बळीराम पेठ भागात ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्या अशोक पाटील यांना वारंवार धमकावून खंडणी मागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित निर्भय ऊर्फ गोटया रविंद्र पाटील याने ऑटोरिक्षा भाड्याने करून देण्यास सांगून त्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी आणि हल्ल्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहितीनुसार, शहरातील दत्तात्रेय नगरात राहणारे अशोक पाटील यांचा बळीराम पेठेत ओम साईराम ट्रान्सपोर्टनावाने ऑफिस आहे. संशयित निर्भय उर्फ गोटया पाटील हा नेहमी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन दादागिरी करुन वेळोवेळी पैसे मागत होता. दरम्यान अशोक पाटील हे देखील त्याला पैसे देत वेळोवेळी मदत करत होते. बुधवार दि. १९ रोजी त्याने शिवजयंतीसाठी ऑटोरिक्षा करून देण्याची मागणी अशोक पाटील यांच्याकडे केली. पाटील यांनी त्याच्या ओळखीच्या चंद्रशेखर सुरेश कोळी यांची ऑटोरिक्षा भाड्याने करून दिली. मात्र, आरोपीने ऑटोरिक्षाचे आठशे रुपये भाडे देण्याचा आग्रह धरला. पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करून धमकावले.
सकाळी ट्रान्सपोर्ट ऑफिसवर हल्ला
गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास संशयित गोटया पाटील हा ट्रान्सपोर्ट ऑफिस समोर आला. त्याने गटारीवरील लोखंडी जाळी फेकून दिली आणि येथे ट्रान्सपोर्ट चालू ठेवायचे नाही, असा दम दिला. त्यानंतर पुन्हा अकरा वाजता पाटील यांनी ऑफिसमध्ये जाऊन त्याला जाब विचारला असता, त्याने पुन्हा शिवीगाळ करत धमकावले.
सुरा घेवून अंगावर धावून गेला
व्यावसायीक अशोक पाटील यांनी आपल्या ओळखीच्या पोलिस कर्मचारी जितू पाटील यांना माहिती दिली. काही वेळाने आरोपी गोटया पाटील हा लोखंडी सुरा घेऊन पाटील व त्यांचा मुलगा राहुल पाटील यांच्या अंगावर धावून गेला. त्याचवेळी पोलिस हवालदार उमेश भांडारकर यांनी वेळीच पोहोचून आरोपीला निःशस्त्र केले आणि त्याच्या ताब्यातील सुरा काढून घेतला. झटापटीत आरोपीच्या उजव्या हाताला जखम झाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध खंडणी आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धमकीसह पैसे उकळण्याच्या घटना नित्याच्याच
या घटनेनंतर ट्रान्सपोर्ट व्यवसायावर दबाव आणण्यासाठी संशयिताकडून वारंवार दादागिरी केली होती. बळीराम पेठसह व्यावयीक भागांमध्ये दारु पिण्यासह मौजमस्ती करण्यासाठी काही तरुणांकडून व्यावसायीकांना धमकी देवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याच्या घटना यापुर्वी देखील घडल्या आहेत. परंतु आपला रोजगाराचा प्रश्न असल्यामुळे कोणीही व्यावसायीक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. या घटनेमुळे व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.