जळगाव प्रतिनिधी | नियतीचा खेळ कधीच कोणाला कला नाही अशीच एक घटना आता जळगाव जिल्ह्यात घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पातोंडा येथील बहिणीच्या भेटीसाठी निघालेल्या भावाचा भेट घेण्यापूर्वीच बसच्या धडकेत अपघातात मृत्यू झाला आहे. अमळनेर तालुक्यातील गडखांब गावाजवळ रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. प्रितेश संजय निकम असं मयत भावाचे नाव आहे.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे प्रितेशची बहिण राहते. बहिणीच्या भेटीसाठी प्रितेश हा गुगळवाळ येथून एमएच ४१ सी ४१३५ या क्रमांकाच्या दुचाकीवरून पातोंडा येथे येत होता. अमळनेर तालुक्यातील गडखांब गावाजवळ एमएच १४ बीटी ३६२९ या क्रमांकाच्या इगतपुरी आगाराच्या चोपडा-नाशिक बसने पुढील बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात प्रितेशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत प्रीतेश हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी अमळनेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे कपिल पाटील व सुनील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या घटनेनंतर अपघातानंतर बस वरील चालक संदीप हरिश्चचंद्र धनावटे अमळनेर पोलिस ठाण्यात स्वत:हून हजर झाला.
गतवर्षी नवापूरजवळ झालेल्या अपघातात प्रितेशच्या कुटुंबातील सहा सदस्य मृत झाले होते. त्यानंतर प्रीतेशच्या वडिलांचेही मागील वर्षी अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई व दोन बहिणी असा परिवार आहे. दोन बहिणींचा तो एकुलता एक भाऊ होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.