जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित उद्योजक सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह इतर आरोपींच्या शोधार्थ राज्यभरात आता पोलिसांची तब्बल नऊ पथके रवाना करण्यात आली आहेत.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे व्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला,योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील माहेश्वरी, सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला हे फरार आहेत. यातील अवसायक कंडारे यांच्या वाहन चालकाने त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात धाड टाकल्यानंतर अहमदनगर ते औरंगाबादच्या दरम्यान सोडले होते.तर दुसरीकडे सुनील झंवर हे नाशिकमध्ये आश्रय घेण्यासाठी येणार असल्याचे कळल्यामुळे पोलिसांनी आधीच तेथे सापळा रचला होता. परंतू झंवर तेथे आलाच नाही. त्यानंतर झंवर इंदौर येथे एका महाराजांची भेट घेण्यासाठी गेला होता. एवढेच नव्हे तर तो मध्यंतरीच्या काळात दोन दिवस जळगावत देखील येऊन गेला होता.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुनील झंवर आणि जितेंद्र कंडारे या दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार दोघांच्या घरावर नोटिसा डकविण्यात आल्या होत्या. लवकरच झंवर आणि कंडारे या दोघांना फरार घोषित केले जाणार आहे.
सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांच्या शोधार्थ ९ पथके मुंबई,नाशिक,इंदौर, जळगावसह राज्यातील इतर भागात रवाना करण्यात आले असून दोघांचा कसून शोध सुरू आहे.
दरम्यान, सर्व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची नऊ पथके वेगवेगळ्या भागात रवाना झाली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.