भुसावळ (प्रतिनिधी) सासरवाडी गाडेगाव (ता. जामनेर) येथून पंधरा दिवसापूर्वी जन्मलेल्या मुलीला मोठ्या आनंदाने बघून घरी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भुसावळात घडली. गिरीश शालिग्राम पाटील ( रा. तुकाराम नगरा, वय २९), असे मयत तरुणाचे नाव असून आजीचे तेरावे आणि मुलीला पाहण्यासाठी तो चार दिवसांपूर्वी भुसावळात आला होता.
गिरीश पाटील हा पुणे येथे रेल्वेत सेवारत होता. आजीचे तेरावे व १५ दिवसांपूर्वीच जन्मलेल्या आपल्या मुलीला पाहण्यासाठी चार दिवसांपूर्वीच तो भूसावावळत आला होता. गिरीश याच्या आजीच्या तेराव्याचा कार्यक्रम १३ मे रोजी झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (दि. १४) गिरीश पंधरा दिवसापूर्वी जन्मलेल्या आपल्या मुलीला पाहण्यासाठी आणि पत्नीला भेटण्यासाठी भुसावळ येथून दुचाकीने गाडेगाव येथे सासुरवाडीला गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले होते.
सोमवारी सकाळी ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान तर तो अचानक घरातच भोवळ येऊन कोसळला. नातेवाइकांनी त्याला डॉ. राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा रक्तदाब शून्यावर होता. डॉ. मानवतकर यांनी त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले. १० ते १२ मिनिटे उपचार केल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. गिरीशचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती डॉ. मानवतकर यांनी दिली. मृत गिरीशच्या पश्चात आई, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा व एक नवजात मुलगी असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी अमळनेर येथील रूपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय ३३) या विवाहितेचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा अधिक वाढला असल्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.