भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे उत्तर वार्ड व पंधरा बंगला शेजारील अतिक्रमण काढल्यानंतर मागील दोन वर्षापासून शेकडो नागरिक बेघर झाले आहेत. या नागरिकांच्या पुनर्वसनाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने भुसावळ ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय असा लॉंग मार्च काढण्याचा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. ७ डिसेंबर रोजी हा पायी मोर्चा निघणार आहे.
भुसावळ उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन वर्षापासून बेघर झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन व्हावे म्हणून मोर्चे निदर्शने रास्तारोको उपोषण असे आंदोलन करण्यात आली. त्यावर प्रशासनाने निव्बळ आश्वासन दिले. परंतू कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अजूनही शेकडो लोकं घरांसाठी वणवण भटकत आहेत. या लोकांकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष केले जात आहे. यामागे राजकीय खेळी असून जातीय कटकारस्थान असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
भुसावळ शहराला लागून तापी नदीला लागून राहुल नगर च्या पाठीमागे सातारा शिवारातील ३६/१८.६० हेक्टर जमीन शासनाकडे उपलब्ध आहे. या जागेबाबत अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलन करतांना उल्लेख केला आहे. तरीदेखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. म्हणून झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर व पुनर्वसनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे आंदोलनची सुरुवात करण्यात येणार आहे. ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ ते जिल्हाधिकारी कार्यालय पाणी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर रमेश मकासरे राजूभाऊ सूर्यवंशी लक्ष्मण जाधव रवी सपकाळे गिरीश तायडे प्रकाश सोनवणे पप्पू सुरडकर शरद सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.