नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पाच राज्यांच्या विधानसभेच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. परंतु उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. योगी सरकारचे कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे दिला आहे. त्याचसोबतच त्यांनी भाजपा पक्षातून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे.
योगी सरकारचे कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी राजीनामा दिला. मौर्य यांनी आपला राजीनामा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे पाठवला आहे. सध्याचे सरकार दलित, मागासवर्गीय, शेतकरी, बेरोजगार तरुण आणि छोटे व्यापारी यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मौर्य यांनी केला आहे. राजीनामा दिल्यानंतर ते थेट समाजवादी पक्षात गेले. अखिलेश यादव यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. फोटोही सोशल मीडियावरून शेअर केला
मौर्य यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील कामगार आणि रोजगार आणि समन्वय मंत्री या नात्याने प्रतिकूल परिस्थितीत आणि विचारसरणीत राहूनही त्यांनी जबाबदारी अत्यंत तन्मयतेने पार पाडली, परंतु दलित, मागासवर्गीय, शेतकरी, बेरोजगार तरुण, लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांच्या अत्यंत दुर्लक्षित वृत्तीमुळे उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे. असे सांगितले.