नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सात राज्यांमधील विधानसभांच्या १३ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने बाजी मारली असून, एनडीएला मोठा धक्का बसला आहे. १३ पैकी १० जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले असून एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालच्या चार, हिमाचल प्रदेशच्या तीन, उत्तराखंडच्या दोन तर मध्य प्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि पंजाबच्या प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले होते. शनिवारी मतमोजणीनंतर समोर आलेल्या निकालानुसार या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने बाजी मारल्याचे स्पष्ट होत आहे. या १३ जागांपैकी ३ जागा भाजपकडे होत्या. काँग्रेसकडे दोन तर तृणमूल, जदयु, आप, द्रमुक, बसपकडे प्रत्येकी एक जागा होती. तीन अपक्ष आमदार होते. पोटनिवडणुकीत काँग्रेसने आणि तृणमूलने चार जागा जिंकल्या. इंडिया आघाडीतील आप आणि द्रमुकने देखील आपापले मतदारसंघ राखत प्रत्येकी एक जागा जिंकली.
भाजपने दोन जागा जिंकल्या असून एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. याचाच अर्थ भाजप आणि जदयुला प्रत्येकी एका जागेचे नुकसान झाले, तर काँग्रेसला दोन आणि तृणमूल काँग्रेसला प्रत्येकी तीन जागांचा फायदा झाला. हिमाचल प्रदेशात भाजपामध्ये गेलेल्या तीनपैकी एकाच अपक्षाचा विजय झाला. दोघे पराभूत झाले. पंजाबमध्ये देखील आपमधून भाजपात प्रवेश केलेल्या शीतल अंगरुल यांचा आपच्या उमेदवाराने पराभव केला. हा निकाल म्हणजे पंजाबची जनता आप सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याची पावती आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिली. भाजपला केवळ हिमाचलच्या हमीरपूर आणि मध्य प्रदेशातील अमरवाडा मतदारसंघात विजय मिळाला आहे.
पश्चिम बंगालमधील चारपैकी तीन जागा भाजपकडे होत्या; परंतु पोटनिवडणुकीत मतदारांनी चारही जागा तृणमूलच्या पारड्यात टाकल्या. या निकालावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनता इंडिया आघाडीसोबत असल्याची प्रतिक्रिया दिली. भाजपने विणलेले भय व भ्रमाचे जाळे तुटले आहे. शेतकरी, युवक, मजुरांसह प्रत्येक वर्ग हुकूमशाहीचा समूळ नाश करून न्यायाचे राज्य प्रस्थापित करू इच्छित आहे. आपल्या आयुष्याच्या कल्याणासाठी आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी जनता आता पूर्णपणे ‘इंडिया’ सोबत उभी आहे. जय हिंदुस्थान, जय संविधान, असे राहुल म्हणाले.