मुंबई (वृत्तसंस्था) हाथरस घटनेच्या विरोधात देशभरात संताप असताना उत्तर प्रदेशातील भाजपच्या मंडळींकडून आरोपींच्या समर्थनार्थ मेळावे घेतले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
सामना’च्या अग्रलेखातून केला आहे. ‘कथुआपासून उन्नाव आणि हाथरसपर्यंत हेच घडत आले आहे. प्रत्येक प्रकरणात आरोपींना पाठिंबा देण्याची दडपशाही केली गेली. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांची डोकी फोडायची ही कसली लोकशाही? आरोपींच्या समर्थनार्थ मेळावे घेण्याचे कृत्य लाजिरवाणे आणि किळसवाणे आहे. अशा किळसवाण्या मेळाव्यांत मुंबईत अन्याय, अत्याचार वगैरेंविरुद्ध लढणाऱ्या नट्यांनी घुसून जाब विचारायला हवा. मुंबईत एक भूमिका व उत्तर प्रदेशात वेगळी भूमिका हे बरोबर नाही. ‘हाथरस’ प्रकरणी मुख्यमंत्री योगी यांना घेरण्याचे कारस्थान त्यांच्याच पक्षात चालू आहे काय?,’ असा संशयही शिवसेनेनं व्यक्त केला आहे. ‘हाथरस, खैरलांजी, बलरामपूरसारखी प्रकरणे मानवतेला कलंक आहेत. एका विकृत मानसिकतेतून ती घडत असतात. त्या विकृतीचे राजकारण करणारेही समाजाचे शत्रू ठरतात. सरकारने पहिल्या दिवसापासून लपवाछपवी केली नसती तर वातावरण इतके चिघळले नसते,’ असं मतही शिवसेनेनं व्यक्त केले आहे.