औरंगाबाद (वृत्तसंस्था) विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठं विधान केलं आहे. “भाजपचा विधान परिषदेत एकनाथ खडसे यांना पाडण्याचा प्लॅन आहे. तसेच भाजपने घोडेबाजारासाठीच पाचवा उमेदवार उभा केला आहे”, असा धक्कादायक दावा जलील यांनी केला आहे.
“एकनाथ खडसे यांना पाडण्यासाठी भाजप पूर्ण ताकत लावणार आहे. मला तर हे पण माहितीय की एकनाथ खडसे यांना उमेदवारी न देण्यासाठी भाजप ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तयार होती”, असा धक्कादायक आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणुकीत एमआयएमचे दोन मतं देखील महत्त्वाचे आहेत. या निवडणुकीत एमआयएम कोणाला मतदान करेल? याकडे सगळ्याचं लक्ष आहे. या दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत एमआयएमचे दोन मतं काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना दिले जातील. पण उद्या आमची मुंबईत बैठक आहे. त्या बैठकीत आम्ही अंतिम निर्णय घेऊ, असं जलील यांनी स्पष्ट केलं.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे पंकजा यांना डावललं जात आहे, अशी भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक देखील आक्रमक झाले आहेत. या सर्व घडामोडींवर देखील इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी जलील यांनी पंकजा यांना वेगळा स्वतंत्र पक्ष काढण्याचा सल्ला दिला. “भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वतंत्र पक्ष काढावा. एमआयएम त्यांना मदत करेल”, असं आवाहन इम्तियाज यांनी केलं.