मुंबई (वृत्तसंस्था) कॉंग्रेस नेते बाळासाहेब बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आहे. थोरात यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी राजकीय कारकीर्दीतला मोठा निर्णय जाहीर केला आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून बाळासाहेब थोरात हे अनेक दिवसांपासून नाराज होते. नाशिक विधान परिषद निवडणुकीत थोरात कुटुंबाविरोधात खूप मोठं राजकारण झालं, असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता.(Maharashtra Congress) यासंदर्भात हायकमांडकडे नाराजी दर्शवणारं एक पत्रही पाठवल्याची माहिती काल थोरात यांनी दिली होती. आज अखेर त्यांच्या काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाच्या राजीनाम्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. तर सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरून काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यासंदर्भात बोलताना नाराजी व्यक्त केली होती.