मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करण्यात यावी अशी मागणी पत्र लिहून निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता या मागणीवर काय निर्णय होणार? याकडे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रभाग रचना तसेच आरक्षण या संदर्भामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच भाजपने सर्व प्रभाग रचना रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकार स्थापन होण्याआधीच इतकी घाई कशासाठी? असा सवाल केला आहे. दरम्यान या मागणीवर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार राम कदम यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून महाविकास आघाडी नेत्याने आपल्या सोयीने प्रभाग रचना केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे प्रभाग रचना रद्द करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने केलेली प्रभाग रचना , गन रचना या सदोष आहे त्यामुळे त्या रद्द करून नव्याने कराव्यात. स्थानिक स्वराज्य संथाच्या प्रभाग रचना अधिकाऱ्यांवर दबाव आणून नियमबाह्य करून घेतल्या. त्यावर हजारो हरकती असल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येणार याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप देखील बावनकुळे यांनी केला आहे. बावनकुळे यांनी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्या तपासून पुन्हा रचना कराव्या अशी मागणी केली. एवढेच नव्हे तर, ते झाल्याशिवाय कुठलीही निवडणूक घेऊ नये. आयोगाने तातडीने या प्रभाग रचना रद्द कराव्या असेही बावनकुळे यांनी म्हटलेय.