मुंबई (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. त्याबाबतचे वेळापत्रकही निवडणूक आयोगाने आज जारी केले आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी मतदान होईल. त्याच दिवशी म्हणजेच 12 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठी येत्या 25 जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसचून जारी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना 2 जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 3 जुलै रोजी अर्जांची छानणी केली जाईल. तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज 5 जुलैपर्यंत मागे घेता येईल. 12 जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल. 12 जुलै रोजीच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, 27 जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), महादेव जानकर (भाजप मित्र पक्ष), अनिल परब (शिवसेना ठाकरे गट), मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट), डॉ. वजाहत मिर्झा व डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), बाबाजानी दुराणी (राष्ट्रवादी), जयंत पाटील (शेकाप) या 11 आमदारांचा समावेश आहे.