सातारा प्रतिनिधी : कुटुंबातील मुलीवर झालेल्या कथित गैरवर्तनाचा सूड उगवण्यासाठी महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका २२ वर्षीय तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याचा नियोजनपूर्वक खून करून मृतदेह नीरा नदीपात्रात फेकून आले दिल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी एकाच कुटुंबातील चौघांना अटक केली आहे.
अविष्कार ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा अविष्कार भगत, ज्ञानेश्वर भरतराव भगत आणि अर्चना ज्ञानेश्वर भगत (सर्व रा. पिंप्रद, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
१७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी गोखळी (ता. फलटण) येथील नीरा नदी पात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला. सुरुवातीला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र डोक्यावर गंभीर जखमा आणि घटनास्थळावरील परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. तपासादरम्यान मृताची ओळख अंकुश बापू नरबट (२२, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा) अशी पटली. माण तालुक्यातील तरुणाचा मृतदेह फलटण तालुक्यात कसा आढळला, याचा याचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक कटाचा उलगडा झाला. अंकुश नरबट याने आरोपींच्या कुटुंबातील एका मुलीबाबत गैरवर्तन केल्याचा आरोप होता. त्याचाच राग मनात धरून आरोपींनी सूड उगवण्याचा कट रचला. महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून अंकुशशी संपर्क साधण्यात आला. प्रेमाचे आमिष दाखवत त्याला भेटीसाठी फलटण येथे बोलावण्यात आले.
१५ फेब्रुवारी रोजी अंकुश फलटण येथे आल्यानंतर संशयितांपैकी एका महिलेने त्याला तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेले. तेथे इतर आरोपी वेगवेगळ्या वाहनांतून दाखल झाले. सर्वांनी मिळून त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला चारचाकीत टाकून निर्जनस्थळी नेण्यात आले आणि त्याचा खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोखळी गावाजवळील नीरा नदीत फेकून देण्यात आला. हा गुन्हा अत्यंत नियोजनपूर्वक केल्यामुळे सुरुवातीला पोलिसांकडे ठोस धागेदोरे नव्हते. मात्र फलटण-दहिवडी मार्गावरील हॉटेल्स, दुकाने आणि पेट्रोलपंपांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून पुराव्यांची साखळी जोडण्यात आली. अखेर या आधारे संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.















