मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे दौऱ्यावर दौरे सुरू आहेत. परंतू आता मंत्री मंडळाचा विस्तार पुन्हा रखडला आहे. या पार्श्वभूमीवर ते आपल्या गटातील 50 आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी ११ ला, तर राज्यातील पीकपाणी परिस्थितीबाबत दुपारी १ ला बैठक घेणार होते. पण या दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आल्या. त्यांनी नंदनवन या शासकीय बंगल्यावर आराम केला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी दुपारीच दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे समजते. भाजपमध्ये काही ज्येष्ठांना बाजूला ठेवून नव्यांना संधी देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. फडणवीस यांनी जुने-नवीन यांचे संतुलन ठेवा, असा आग्रह धरल्याची माहिती आहे.
राज्यात ३५ दिवसांपासून अडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आजही निघाला नाही. मात्र, फडणवीस यांच्या आजच्या दिल्ली बैठकीत भाजपची नावे अंतिम झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून अधिकची मंत्रिपदे आणि विशिष्ट खात्यांचा आग्रह धरला जात असल्याची आणि विस्तार लांबणीवर पडण्याचे तेही एक महत्त्वाचे कारण असल्याचीही माहिती आहे. फडणवीस हे दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटले तेव्हा यासंदर्भात तिथूनच दूरध्वनीवर शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली तर उपमुख्यमंत्री दिल्लीत ;आमदार मात्र अस्वस्थ
नुकतेच कालपासून मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने ते आराम घेत आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले असताना शिंदे गटातील आमदार मात्र अस्वस्थ झाल्याचे चित्र दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या गटातील ५० आमदारांची बैठक बोलावली आहे. सायंकाळी ६ वाजता नंदनवन या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीत आमदारांना संयम ठेवण्याचा सल्ला आणि त्यांच्या मनातील संभ्रम एकनाथ शिंदे यांच्याकडून दूर केला जाईल, अशी माहिती आहे.
उद्या राज्यपाल दिल्लीत जाणार ; १० पर्यंत होणार मंत्री मंडळ विस्तार
दरम्यान, उद्या म्हणजेच ६ तारखेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे, मंत्रीमंडळ विस्तार आता सोमवार किंवा मंगळवारीच होईल, असे दिसून येते. कारण, ८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात राज्यातील राजकीय पेचावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता ८ ऑगस्टनंतरच विस्तार केला जाईल, अशी शक्यता आहे.