मुंबई (वृत्तसंस्था) बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे. याशिवाय, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या कार्यालयाला आणि घराला केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे. वैजापूरमध्ये सीआरपीएफचे जवान तैनात झाले असून, त्यांनी बोरनारे यांच्या घराचा ताबा घेतला आहे. तसेच, आज संध्याकाळपर्यंत 15 आमदारांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शनिवारी एकनाथ शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांना केंद्राची सुरक्षा मिळाल्यानंतर शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात आली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे की, आता या कारस्थानामागे भाजप असल्याचं स्पष्ट झालं आहे.