चोपडा (प्रतिनिधी) पारंपरिक प्रथेला फाटा देत दोघं मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला अग्नीडाग देत समाजापुढे आदर्श निर्माण केल्याची घटना चोपडा तालुक्यातील चुंचाळे गावात पहायला मिळाली. यावेळी अंत्ययात्रेतील उपस्थितांचे डोळे भरुन आले होते.
चोपडा तालुक्यातील चुंचाळे गावातील प्रगतशील शेतकरी विठ्ठल तुकाराम पाटील यांचे (वय ७६) यांचे अल्पशाः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. तर या दोन्ही मुलींचे लग्न झाले असून त्यांना भाऊ नाही. त्यामुळे आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी चोपडा येथील सुरेखा कमलाकर भामरे व लहान हातेड येथील लहान मुलगी जागृती भूषण बाविस्कर या दोन्ही बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देऊन स्मशानभूमीत अग्नीडाग दिला. यामुळे त्यांचे समाजात सर्वत्र कौतुक केले जात आहे. कारण भाऊ नसला तरी भावाचे कर्तव्य मुली ही पार करु शकतात, असा संदेश त्यांनी यानिमित्त समाज बांधवांना दिला आहे.