साकळी ता.यावल (वार्ताहर) सध्या दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढला असून वातावरणात बदल झाल्यामुळे गावात सर्दी खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक घरांमध्ये सर्दी खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली असून गावात कोरोना परत येतो का ? अशी भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. एकूणच सर्दी,खोकला व इतर ताप सदृश्य आजारांनी डोकेवर काढल्याने आरोग्य प्रशासना समोर सुद्धा मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावात दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत आहे. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे गेल्या पाच -सात दिवसांपूर्वी परिसरातली थंडी अचानक गायब झालेली होती व वातावरण उबदार बनले होते. त्यानंतर थंडीने अचानक जोर घेतल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढलेल्या आहे. गावात अनेक घराघरांमध्ये सर्दी, खोकला व इतर ताप सदृश्य आजारांचे रुग्ण आढळून आलेले आहेत. हे रुग्ण गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी दवाखान्यात उपचार करीत आहे. जर का एखाद्याचा ताप कमी होत नसल्यास अथवा खोकल्याचा त्रास जास्त जाणवत असल्यास ते रुग्ण बाहेर गावी जाऊन उपचार घेत आहे. त्याचप्रमाणे गावात अधून- मधून टायफाईड, मलेरिया व इतर सदृश्य आजारांचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक रुग्णांना खोकल्या चा त्रास खूप मोठ्या प्रमाणात जाणवत असून अनेक प्रकारचे औषधे घेऊन सुद्धा त्यांच्या खोकल्याचा ‘ जिवघेणा ‘ त्रास कमी होत नसल्याने त्यांना आरोग्याची चिंता वाटत आहे.
राज्यातील इतर भागातील कोरोनाची वाढती संख्या पाहता आपल्या गावातही कोरोना पुन्हा शिरकाव करतो की काय ? अशी नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. जून व जुलै दरम्यान गावात कोरोनाचे खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आलेले होते, तेव्हा ऊनही चांगलेच तापत होते व नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली होती. त्यादरम्यान गावातील कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आलेला होता. मात्र, आता या थंडीच्या काळात जर नागरिकांनी योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास कोरोनाने ‘डोके ‘ वर काढले तर परिस्थिती फार भयावह होऊ शकते, असेही आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांपासून गावात कोरोना एकदाचा पुर्ण गेला या भावनेतून लोक विना मास्क बाहेर फिरतांना दिसत आहे. ही बाब नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार धोकेदायक बनली आहे .तेव्हा नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन सतर्क राहणे गरजेचे आहे.
नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचेच : डॉ.सागर पाटील
गाव परिसराचा सध्या थंडीचे प्रमाण वाढत असल्यामुळे तापअदृश्य सह इतर आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केलेली असून त्यापाठोपाठ कोरोना चा संसर्ग फैलू शकतो .त्याकरता नागरिकांनी बाहेर जातांना तोंडाला मास्क लावणे महत्वाचे आहे.त्यासोबत गरम पाणी व रोगप्रतिकारक काढा घेणे गरजेचे आहे .त्याचप्रमाणे मोठ्या शहरांकडे येणे-जाणे टाळावे .शक्यतो प्रवास करणे ही टाळावे.तसेच थंडी, ताप, खोकला यावर वेळीच उपचार करणेही गरजेचे आहे, असे साकळी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी सांगितले.