मुंबई (वृत्तसंस्था) ‘लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत,’ असं आव्हान आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना दिलं आहे.
मेट्रो कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरित्या उद्या होणाऱ्या ५० हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी काँग्रेस सोबत करताय की काय? असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून मेट्रो कारशेड बाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महाविकास आघाडी सरकारने कांजूरमार्गच्या जागेवर मेट्रो कारशेड प्रस्तावित केले. महाराष्ट्रातील इंच इंच जमीन महाराष्ट्राची अशी भावनिक अस्मितेची ढाल करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. पण ही जागा महाराष्ट्राची नसून केंद्र सरकारचीच आहे, असा पहिला दावा १९८३ साली केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारनं केला होता. ही जागा महाराष्ट्राच्या नावावर करण्यात यावी हा दावा २०१४ साली देवेंद्र फडणवीस सरकारने केला होता. कांजूरची जागा दिल्लीची आहे असं सांगणाऱ्या कॉंग्रेस सोबत तुम्ही सलगी केली आहे आणि ही जागा महाराष्ट्राचीच असा निर्णय देणाऱ्या भाजपविरुद्ध तुम्ही लढत आहात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असं शेलार यांनी पत्रात म्हटलं आहे.
दुर्दैवाने आपले सरकार मुंबईकरांवर अन्याय करतेय. दिशाभूल करतेय. केवळ मेट्रो प्रकल्पाला विलंब होऊ नये म्हणून एक मुंबईकर म्हणून मी आपल्याला काही प्रश्न विचारत आहे व चर्चेचं आवाहन करत आहे. चर्चेत तुम्ही खरे ठरलात तर मुंबईकरांसाठी मी जाहीर माफी मागण्यास तयार आहे, असंही शेलार यांनी म्हटलं आहे.