मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या महिन्याभरापासून अधिक काळ एसटी कर्मचार्यांचा संप अद्यापही थांबलेला नाही. त्यामुळे कामावर न परतणार्या एसटी कर्मचार्यांवर महामंडळाकडून निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. पण आता निलंबनाची ही कारवाई मागे घेण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. सोमवारपर्यंत जे एसटी कर्मचारी कामावर येतील त्यांचे निलंबन मागे घेऊ असे परब यांनी म्हटले आहे.
अनिल परब यांनी शुक्रवारी पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या चर्चेनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कर्मचाऱ्यांना शेवटची हाक दिली आहे. यात अनेकांनी आपण कामावर आल्यानंतर डेपोत प्रवेश दिला जात नाही अशा तक्रारी केल्या आहेत. एसटी कामगार कामावर येण्याससाठी तयार असतानाही त्यांची अडवणूक केली जात आहे. कुणी तुम्हाला अडवत असेल तर त्याबाबत पोलिसांत तक्रार करा किंवा डेपो व्यवस्थापकासमोर तक्रार करा असे परब म्हणाले आहेत.
वेतन वाढीसह काही मागण्या मान्य केल्यानंतरही आंदोलक कर्मचारी कामावर येण्यास तयार नाहीत. अशात सरकारने आतापर्यंत १० हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. तर काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोर्टाशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असेही काहींच्या लक्षात आले आहे. मेस्माचा प्रस्ताव सुद्धा रद्द करण्यात आला. काहींनी आत्महत्या केल्या. या आत्महत्येची कारणे वेगळी पण असू शकतात असे परब म्हणाले.
आता सरकारने सोमवारपासून निलंबनाची कारवाई झालेल्या आणि नाही झालेल्या अशा सर्वांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी ५० टक्के कर्मचारी संख्या पूर्ण होईल तेथे काम सुरू केले जाईल. ज्या ठिकाणी ही संख्या भरणार नाही त्यांना दुसऱ्या डेपोत पाठवून काम सुरू केले जाईल. निलंबित कर्मचारी कामावर परतल्यास त्यांचे निलंबन रद्द केले जाईल. यानंतरही कुणी येत नसेल तर मात्र त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहे.