जळगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे. कोरोना काळात ग्रामीण पातळीवर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने राजकीय पक्षांमध्येही उत्साह वाढला आहे. राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी जळगाव जिल्ह्यात मात्र, काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आता परंपरागत शत्रू असलेल्या भाजपसह मित्रपक्षांविरुद्ध मोट बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत एकत्र आहेत. परंतु, असे असले तरी निधी वाटपासह महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेत सापत्न वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी काँग्रेसच्या नेतेमंडळीकडून केल्या जात आहेत. याचेच पडसाद ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यात उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. याठिकाणी काँग्रेसने वेगळी चूल मांडत ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्हा हा पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मध्यंतरीच्या काळात काँग्रेसचा प्रभाव ओसरून भाजपने जिल्ह्यात पाळेमुळे रोवली. मात्र, आता पुन्हा भाजप विरोधात वातावरण निर्माण झाल्याने काँग्रेस ग्रामीण पातळीवर निश्चितच मुसंडी मारेल, असा विश्वास काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आहे.
कोरोनाच्या काळात होत असलेली ग्रामपंचायत निवडणूक ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. ही पक्ष विरहीत मानली जात असली तरी या निवडणुकीच्या माध्यमातून जनमताचा कौल समजतो, असे मानले जाते. म्हणून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच ग्रामीण भागात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यात कार्यकर्तेही स्वबळावर लढण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले. म्हणूनच काँग्रेसने ‘एकला चलो रे’ भूमिका घेतली आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये मित्रपक्षांनी अनेकदा काँग्रेससोबत दगाफटका केला आहे. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन ग्रामीण भागात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही निवडणूक संधी असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. याचाही विचार काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे. त्यामुळेच काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीबाबत काँग्रेसची भूमिका मांडताना काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना म्हणाले की, ही निवडणूक खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांसाठीची निवडणूक मानली जाते. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने गावपातळीवर बैठक घेतल्या. त्यात कार्यकर्त्यांनी संमिश्र मते मांडली. धर्मनिरपेक्ष मताच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची ताकद कमी आहे, अशा ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढायला हरकत नाही. तसेच ज्याठिकाणी आपली ताकद आहे, त्याठिकाणी मात्र स्वबळावरच लढायला हवे, असा आग्रह धरला. या माध्यमातून कार्यकर्त्यांना न्याय देता येऊ शकतो, असाही कार्यकर्त्यांचा सूर होता. कार्यकर्त्यांच्या मताचा विचार करून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काँग्रेसची ताकद पाहता ७० ते ८० टक्के ग्रामपंचायतींमध्ये स्वबळावर लढण्यावर आमचे एकमत झाले आहे. काँग्रेस निश्चितच आपली ताकद दाखवून देईल, असाही विश्वास डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केला.