जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आता सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीस (खरेदी-विक्रीची नोंदणी) येताना प्रत्येकाला कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यास बंधनकारक करण्याचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहेत. तसेच या चाचणी वैधता ४८ तास गृहीत धरली जात आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच दस्त नोंदणी कार्यालयाचे नोंदणीचे व्यवहार ठप्प होऊन, कार्यालय बंद झाले की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे दस्त नोंदणीस अँटीजन टेस्ट ग्राह्य धरली जावी, अशी मागणी साहेबांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.
शासनाला जमीन, जागा प्लॉटच्या दस्त नोंदणीतून मुद्रांक शुल्काद्वारे माठा महसूल मिळतो. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आता सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीस (खरेदी-विक्रीची नोंदणी) येताना प्रत्येकाला कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यास आदेश देण्यात आले आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच दस्त नोंदणी कार्यालयाचे नोंदणीचे व्यवहार ठप्प होऊन, कार्यालय बंद झाले की काय? असे म्हणण्याची वेळ आली आहे. दस्तनोंदणीसाठी विक्री व खरेदी करणाऱ्यासह किमान ६ लोक उपस्थित असतात. आरटीपीसीआर चाचणीचा खर्च प्रत्येकी एक हजार रुपये आहे. तसेच रिपोर्ट यायला २ ते ३ दिवस लागतात. तशात आरटीपीसीआर चाचणीची मुदत फक्त ४८ तास देण्यात आली आहे. शासकीय सुट्टी, तांत्रिक अडचणी लक्षात घेता यामुळे दस्तनोंदणी शक्य नाहीय. यामुळे शासनाचे महसूलसुद्धा बुडतोय. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणी ऐवजी अँन्टीजेन टेस्ट करून दस्तनोंदणी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी केली आहे.
















