मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आत १७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी खडसेंनी याचिका दाखल केली होती.
आज खडसे यांच्या याचिकेवर कामकाज झाले. खडसे यांचे वकील इतर कामात व्यस्त असल्याचे कारण दाखवण्यात आले असून न्यायालयास वेळ मागून घेण्यात आला. त्यामुळे एकनाथराव खडसे यांच्या पुढील सुनावणीचे कामकाज आता १७ फेब्रुवारी रोजी होईल. सदर सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होईल तोवर खडसे यांना संरक्षण मिळेल. याप्रकरणी सुनावणी होत नाही तोपर्यंत खडसे यांच्याविरुद्ध ईडीला कारवाई करता येणार नसल्याचे दिसत आहे. ईडीने खडसे यांच्याविरुद्ध इसीआयआर दाखल केला आहे. तो रद्द होण्यासाठी खडसे यांनी याचिका दाखल केली आहे.
एकनाथ खडसे यांच्या विरोधात ईडीने ECIR दाखल केला आहे. खडसे यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. मंत्री असताना खडसेंनी कोट्यवधी रुपयांची जमीन लाटल्याचा त्यांच्यावर आरोप झाला होता. याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पुणे एसीबीने केला होता. यानंतर तपास झाल्यावर याबाबत गुन्हा घडला असल्याचं आढळून येत नसल्याने एसीबीने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. आता याच प्रकरणाचा ईडीने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ईडीने खडसे यांची चौकशीही केली. मात्र, त्यांना चौकशीसाठी पुन्हा यावं लागेल, अस सांगण्यात आलं होतं. यामुळे ईडी आपल्याला अटक करू शकते, असं खडसे यांना वाटल. यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात आपल्या विरोधात ईडीने दाखल केलेला ECIR रद्द करावा या मागणीसाठी याचिका केली आहे.