मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील रुईखेडा गावात नितेश अशोक पाखरे (वय २२, रा. टाकळी) या युवकाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, रविवार ११ में रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. नितेश महावितरण कंपनीसाठी अग्रवाल कंत्राटदारामार्फत इलेक्ट्रिक पोलवर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला आणि त्याला जोरदार झटका बसला.
या अपघातामुळे तो पोलवरून खाली कोसळला. तातडीने त्याला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितेश केवळ दीड महिन्यांपासूनच कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. त्याच्या अकाली जाण्याने आई-वडील आणि भावासह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संतापाची लाट
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून नातेवाईक व ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारावर ताशेरे ओढले आहेत. विद्युत प्रवाह बंद न करता काम सुरू करण्याची परवानगी देणे म्हणजे सरळसरळ जीवाशी खेळ असल्याचे आरोप होत आहेत.
आ. चंद्रकांत पाटील यांचा हस्तक्षेपः १५ लाखांची भरपाई मंजूर
घटनेची माहिती मिळताच आ. चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ रुग्णालय गाठून मृताच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कंत्राटदाराला धारेवर धरून, नुकसानभरपाई म्हणून १५ लाख रुपये मदतीची मागणी केली. यावर कंत्राटदाराने २ ते ३ दिवसात १० लाख रुपये आणि पुढील ५ ते ६ दिवसात ५ लाख रुपये देण्याचे कबूल केले आहे.
 
	    	
 
















