मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतल्या मालाड क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यात येणार आहे. त्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हा वाद समोर आला आहे. संकुलाच्या बाहेर भाजप आणि बजरंग दलाने घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे. भाजप आणि बजरंग दलाकडून या नावला विरोध केला जातो आहे.
घटनास्थळी पोलीस देखील मोठ्या प्रमाणात पोहोचले. यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. अस्लम शेख जाणीवपूर्वक टिपू सुलतानचं नाव क्रीडा संकुलाला देत आहेत, असं आंदोलक म्हणाले. जेव्हा पर्यंत या संकुलाचं नाव बदललं जात नाही, तोपर्यंत या संकुलाचं उद्घाटन होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, त्यांच्या भूमीत टिपू सुलतान सारख्या व्यक्तीचं नाव देणं, म्हणजे अपमान आहे, तुम्हाला इथे हिंदूंना राहू द्यायचं नाही का, असा सवाल आंदोलकांनी केला.
अस्लम शेख हे अनधिकृत बांधकाम करत आहेत. त्यांनी मालवणी परिसराचं पाकिस्तान केलंय. ते हिंदूंना या परिसरातून हाकलून लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. बजरंग दल आणि भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. या आंदोलनामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालाय. आंदोलकांनी बस थांबवत चाकातील हवा काढून टाकली. बसमधील प्रवाशांना रस्त्यावर थांबावं लागतंय. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लावलेले बॅनर आणि फलक आंदोलकांनी फाडून टाकले आहेत. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.