जळगाव (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत जळगाव तालुक्यातील रिधुर येथील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पॉलिसीचे वितरण मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील (मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी पिक विम्याचे कवच घेणे अतिशय आवश्यक असून बदलत्या हवामानामुळे व उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपण आपल्या शेतात लागवड करीत असलेल्या पिकाचा विमा उतरवणे गरजेचे असून नुकसान झाल्यास निदान लागवड केलेल्या पिकाचा प्राथमिक खर्च मिळण्यास तरी मदत होईल असे प्रतिपादन मा.गुलाबरावजी पाटील यांनी केले.
शासनाने “फसल बिमा पाठशालेचे” आयोजन केलेले असून त्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेबाबत जनजागृती व शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या काढलेल्या विमा पॉलिसी घरपोच देण्याचे नियोजन करण्यात आलेले असून “मेरी पॉलिसी मेरे हाथ”हा उपक्रम संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र शासन कृषि विभाग व एग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया यांच्यातर्फे हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असून विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व स्थानिक बँकेमार्फत विमा काढलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा पॉलिसी नंबर व तपशील सह पॉलिसीचे वितरण करण्यात येत आहे.
सदरी कार्यक्रमाच्या प्रसंगी तालुका कृषि अधिकारी श्री. शिवाजी राऊत, मंडळ कृषि अधिकारी श्री.श्रीकांत झांबरे, श्री.एम.जी जंगले, श्री.नरेंद्र पाटील, विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी श्री.विजय अस्वार, श्री.योगेश्वर पाटील, श्री.मिलिंद अहिरे, शेतकरी श्री.नंदू भाऊ पाटील, श्री. सचिन पाटील व इतर गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.












