पुणे (वृत्तसंस्था) श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू नगरित आले होते. त्यांनी मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केलं. देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याला देखील प्रशस्त करते. तसेच, संत तुकाराम महाराजांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “भगवान श्री विठ्ठल आणि सर्व वारकऱ्यांच्या चरणावर माझे कोटी कोटी वंदन. आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलं आहे, मनुष्य जन्मात सर्वात दुर्लभ संतांचा सत्संग आहे. संतांची कृपा झाली, तर ईश्वराची अनुभती आपोआप होते. आज देहूच्या या पवित्र, तीर्थ भूमीवर मला येण्याचं भाग्य लाभलं आणि मी देखील इथे तिच अनुभती घेत आहे. देहू संतशिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आहे, कर्मस्थळ देखील आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव. तेथे नांदे देव पांडुरंग, धन्य क्षेत्रवासी लोक ते देवाचे. उच्चारीती वाचे नामघोष. देहूमध्ये पांडुरंगाचा नित्य निवास देखील आहे आणि इथला प्रत्येकजण स्वत: देखील भक्तीने ओतप्रोत असा संतस्वरुपच आहे. या भावानेने मी देहूतील सर्व नागरिकांना माझ्या माता-भगिनींना आदरपूर्वक नमन करतो.”
तसेच, “काही महिन्यापूर्वी मला पालखी मार्गातील दोन राष्ट्रीय राजमार्गांच्या चौपदरी करण्याच्या कामाचे उद्घटान करण्याची संधी मिळाली होती. श्री संत ज्ञानेश्वर महारज पालखी मार्गाची निर्मिती पाच टप्प्यांमध्ये होईल आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची निर्मिती तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाईल. या सर्व टप्प्यांमध्ये ३५० किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे महामार्ग बनतील आणि यावर ११ हजार कोटींपेक्षाही जास्त रुपये खर्च केले जातील.या प्रयत्नांनी क्षेत्राच्या विकासाला देखील गती मिळेल.” असंही मोदींनी यावेळी सांगितलं.
याचबरोबर, “आज नशीबाने पवित्र शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी मला देहूत येण्याची संधी मिळाली आहे. ज्या शिळेवर स्वत: संत तुकारामांनी १३ दिवस तपस्या केलेली आहे, जी शिळा संत तुकारामांच्या बोध आणि वैराग्याची साक्ष बनलेली आहे, मी असं मानतो की ती केवळ एक शिळा नाही, ती तर भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा स्वरुप आहे. देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीच्या शक्तीचेच केंद्र नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याला देखील प्रशस्त करते. या पवित्र ठिकाणाची पुर्ननिर्मिती करण्यासाठी मी मंदिर न्यास आणि सर्व भक्तांचे हृदयपूर्वक अभिनंद करतो, आभार व्यक्त करतो.” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
काळे कपडे घालून येणाऱ्यांना होती प्रवेशबंदी
दरम्यान, मोदींच्या प्रत्येक सभेत जसे काळे कपडे वर्ज असतात तसे आजच्या सभेत देखील काळे कपडे, मास्क, कुठल्याही प्रकारचे काळे कपडे गेटवरच काढून घेण्यात येत होते. नागरिकांना चावी, पाण्याची बाटली, कुठल्याही प्रकारची पिशवी देखील घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली.