
धरणगाव, प्रतिनिधी : गुरुपौर्णिमा अर्थात आषाढ पौर्णिमेनिमित्त धरणगाव येथील जुनी पोलीस लाईनजवळील श्री दत्तात्रेय अध्यात्मिक संस्थान (अग्नी आखाडा) येथे दि. २९ जुलै रोजी श्री दत्तात्रेय महाराज महापूजा, महाआरती व महाप्रसाद सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यंदा संस्थानाच्या स्थापनेचे ६० वे वर्ष पूर्ण होत असल्याने गुरुपौर्णिमा महोत्सवासह हिरकमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
भारतीय संस्कृतीतील गुरुतत्त्वाच्या उपासनेचा सर्वोच्च दिवस मानल्या जाणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या भक्तिमय सोहळ्यास खान्देशासह मध्य प्रदेश, गुजरात आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती लाभते. पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, वेदमंत्रांच्या गजरात आणि दत्तनामाच्या अखंड जयघोषात श्री दत्तात्रेय महाराजांची विधिवत महापूजा, अभिषेक व पूजन करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता महाआरती होऊन सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. संपूर्ण परिसर “श्री दत्तात्रेय महाराज की जय”, “श्री गुरुदेव दत्त” आणि हरिनामाच्या गजराने भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघतो. या उत्सवाद्वारे गुरुतत्त्वाचे महत्त्व, अध्यात्म, सेवा, संस्कार, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो.vयावेळी परमपूज्य गुरुवर्य राजयोगी श्री धनराजनाथजी, परमपूज्य राजयोगिनी सुनंदामाताजी तसेच परमपूज्य राजयोगी श्री सागरनाथजी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुतत्त्वाचे महत्त्व स्पष्ट करण्यात येणार असून नवभक्तांना दीक्षाही दिली जाणार आहे. या महोत्सवाचे नियोजन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळाच्या वतीने करण्यात आले असून, भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या आयोजनासाठी अशोक परदेशी, किशोर परदेशी, पराग गरुड, सागर जगताप, कांतीलाल मराठे, दिगंबर चौधरी, कृष्णा वाघ, जयंत पाटील, विष्णु जाधव तसेच पुरुषोत्तम चौधरी हे विशेष परिश्रम घेत असून, या पवित्र सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
















