मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे. दरम्यान, आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा असं वाटतं का ? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यायला हवा असं मत पंकजा मुंडेनी व्यक्त केलं आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामाही घेतलाय. विशेष म्हणजे अशाच एका प्रकरणात धनंजय मुंडेसुद्धा अडकले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलंय. करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, असंच पंकजा मुंडेंनी सुचवलंय. पंकजा मुंडेंच्या या विधानानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. पूजा चव्हाणच्या मृत्यूशी थेट संबंध असल्याने संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपने दिला होता. यामुळेच, अधिवेशना आधी संजय राठोड यांच्या राजीनामा घ्यावा यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा देखील दबाव होता. वाढत्या दबावामुळे अखेर संजय राठोड यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला.
जर कोणावर अशा प्रकारचं बोट दाखवलं गेलंय. त्यांनीच स्वतःची भूमिका ही स्वतःहून घेतली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. मग राजकीय जीवनामध्ये लोक त्यांच्याकडे मान उंचावून बघतील. व्यक्तिगतही मी या गोष्टीचं कधीच समर्थन करू शकत नाही. ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनीच भूमिका घ्यायला हवी, धनंजय मुंडेंचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यावा. त्यांनी भूमिका ही नैसर्गिक घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे प्रकरणाचं समर्थन करू शकत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही आमच्या पक्षाचीही मागणी आहे. राजकारणात काय पायंडे चाललेत ते स्त्रियांच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत. झगडणाऱ्या स्त्रीसाठी, चांगला काम करणाऱ्या स्त्रीसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. असंही भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्यात.