धरणगाव प्रतिनिधी : येथील महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील खत्री गल्ली परिसरात राहणारे गणेश रावतोळे यांच्या घरातील विद्युत मीटरला दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भीषण होती की, ती विझवण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात वारंवार लोड सेटिंग व वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत अनेक वेळा महावितरणकडे तक्रारी करूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
“आमच्याकडे लोड सेटिंगचा प्रॉब्लेम आहे, याकडे लक्ष द्या,” अशी मागणी वारंवार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी अधिकारी व कर्मचारी परिसरात आले होते, मात्र त्यांनी केवळ औपचारिक पाहणी करून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची भावना देखील स्थानिकांनी व्यक्त केली.
या घटनेनंतर “नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महावितरण प्रशासनाने तातडीने संबंधित भागातील विद्युत यंत्रणेची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.













