मुंबई (वृत्तसंस्था) ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन देशभरातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आज भाजपा आमदार नितेश राणे यांनी इशारा दिलाय. नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना पत्र लिहून या मुद्द्यावर जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा, असं आव्हानच दिलं आहे.
नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना दोन पानी पत्रं पाठवलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या संघाच्या तालिबानशी युती करण्याच्या मुद्द्याला आक्षेप घेतला आहे. संघाची तुलना तालीबानशी करणं हा नियोजीत षडयंत्राचा भाग आहे. तालिबानी प्रवक्त्यासारखी भुमिका घेत कुटनितीनं हिंदुत्वाशी तुलना करण्यात आली आहे. हिंदुत्वाबद्दल एवढा राग कशासाठी?, असा सवाल राणेंनी केला आहे. कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या सासुसरवाडीचा तुमच्यावर चांगलाच प्रभाव आहे. जो व्यक्ती जिथ राहतो त्यावर प्रेम करतो. मग त्याचा धर्म आणि उपसना पद्धती कोणतीही असली तरी तो आमच्यासाठी हिंदूच आहे. हिंदु धर्माबद्दलच्या अज्ञानाबद्दल आपली दया येतेय, असंही त्यांनी म्हटलं आहे.
तुम्हाला महिलांच्या हक्काबद्दल किती माहिती आहे? ट्रिपल तलाकच्या वाईट परंपरेवर तुम्ही कुठे होता?, असा सवाल करतानाच तुम्हाला एक आठवड्याची मुदत देतो. कोणतही सार्वजनिक व्यासपीठ किंवा न्यूजरूम निवडा या मुद्द्यावर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अन्यथा बिनशर्त माफी मागा, असंही त्यांनी म्हटलं होतं.