जळगाव (सुरेश उज्जैनवाल) : अलीकडे प्रतिस्पर्धक, कट्टर विरोधकांचे राजकीय हिशेब चुकते करण्यास शासनकर्त्यांकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे अनुभवास येत आहे. त्यामुळे इतर सामाजिक किंवा लोककल्याणचे महत्वाचे विषय गौण ठरले आहेत. प्रखर सूड भावनेचा हा खेळ भलेही एखाद्या नेत्याला नामोहरम करण्यासाठी असला, तरी त्याची सर्वांत मोठी किंमत सार्वजनिक सहकारी संस्थेला मोजावी लागू शकते, याचेही भान ठेवले गेले पाहिजे.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातील वेगवान घडामोडी लक्षात घेता सूड प्रवृत्ती किती टोकावर गेली आहे, त्याची प्रचिती येते. एरवी दूध संघावरील संचालक मंडळ काही दिवसांनी माजी होणार असून संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेची प्राथमिक प्रक्रिया देखील सुरू झाली आहे, अशी वस्तुस्थिती असताना संचालक मंडळ बरखास्त करून तेथे नवीन प्रशासक मंडळ राज्यातील नव्या सरकारने नियुक्त केले आहे, केवळ एवढंच नव्हे, तर संचालक मंडळाच्या कारभाराची तातडीने चौकशी करून काही अनियमितताही समोर आणण्यात आल्या आहेत. त्या कथित अनियमितते संबंधित वस्तुस्थिती यथावकाश समोर येईल, पण वेगाने विकासाच्या दिशेने स्थिरावणाऱ्या दूध संघाला हकनाक संशयाच्या गर्तेत ओढण्याचा उपद्व्याप कशासाठी? वास्तविक पहता आरोप करणाऱ्यांपैकी या संस्थेच्या जडण-घडणीत अथवा अडी-अडचणी सोडविण्यात कधी काही हातभार राहिला आहे का?
मुळात दूध संघ 1995 पासून प्रचंड अडचणीचा सामना करीत सन 2016 नंतर खऱ्या अर्थाने विकासाच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. एकमेकांचे किंवा विरोधक राजकारण्यांचे विद्यमान सत्ताधाऱ्यांनी राजकीय हिशेब चुकते करण्यास हरकत नाही, कारण त्या शिवाय राजकीय हिरोही होता येत नाही, पण त्यासाठी संस्था वेठीस धरू नये. आधीच अनेक मोठ्या सहकारी संस्था गैरकारभार व पक्षीय वर्चस्वाच्या लढाईत बळी ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. गेल्या दोन दशकात राजकारणात घट्ट पाय रोवलेल्या कोणत्या लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या अर्थकारणासह रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या किती नवीन संस्था उभ्या केल्या, या प्रश्नाच उत्तर आहे का ?.
जिल्हा दूध संघाची ही कामगिरी मोठी आश्वासक तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यां प्रति बांधिलकी दर्शवणारी आहे. जिल्हा दूध संघ हा आज च्या काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी केवळ संस्था नसून आर्थिक श्वास ठरतोय. संघाची वाटचाल पन्नास वर्षांची असली तरी खरे स्थैर्य व विकासाची निश्चित दिशा सहा वर्षा पूर्वी तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्यानेतृत्वा खाली कार्यान्वित झालेल्या संचालक मंडळाने निश्चित केली. कोणताही पक्षीय भेदाभेद किंवा पक्षीय अभिनिवेश न बाळगता निर्वेध वाटचाल करीत आहे. त्याचीच फल; निष्पत्ती म्हणून नवीन अत्याधुनिक प्रकल्प उभा राहू शकला आहे. गेल्या सहा वर्षातील कामगिरीकडे दृष्टीक्षेप टाकला असता लक्षणीय प्रगतीचा टप्पा या संघाने गाठला आहे. शेतकऱ्यांसाठी पूरक उद्योग नव्हे, तर फायद्याचा उद्योग म्हणून संघाने सिद्ध केले आहे.
संघाच्या १९९० ते १९९५ पर्यंतच्या काळाचे अवलोकन केल्यास संघाचं कार्य आणि व्यवस्थापन बऱ्याच अडचणींना तोंड देत मोडकळीस येतो की काय, अश्या अवस्थेत आलं होतं. तत्कालीन शासनाच्या निर्णयानंतर एन.डी.डी. बी.ने संघाची सूत्रे घेत संघाचा प्रकल्प यशस्वीरीत्या सावरण्याचा प्रयत्न केला. १९९५ ते २०१५ या काळापर्यंत एन.डी.डी.बी.चं प्रशासक मंडळ कार्यरत होत.त्यानंतर २०१५ मध्ये संघाची निवडणुक झाली आणि श्री.खडसे यांच्या पुढाकाराने नवीन संचालक मंडळ कार्यन्वित झाले. संघाचा जो विस्तारित आधुनिक प्रकल्प आज उभा आहे, हे माजी मंत्री श्री.खडसेंच्या प्रभाव व दूरदृष्टीचा परिपाक आहे. विस्तारित प्रकल्पामुळे दूध संकलन क्षमता ५ लाख लिटरपर्यंत असणार आहे, गेल्या वर्ष भराचे दूध संकलन सरासरी प्रतिदिन २ लाख ६० हजार लिटर पेक्षा जास्त राहिले आहे.तर संघाचे ‘ विकास ‘ दूध व दुधजन्य पदार्थाच्या विक्रीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे.
दुध संघाचा जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक विकासात मोठा वाटा असून जळगावसह जिल्हाभरात ‘विकास’ दूध विक्री केंद्राच्या माध्यमातून २० हजार गरजू व तरुणांना कायमचा रोजगार मिळाला, तर २०० पेक्षा जास्त टँकर, ट्रक, मेट्याडोअर, पिकअप व्हॅन आदी वाहनांना दररोज वाहतूक व्यवसाय मिळतो आहे. संघाला दररोज दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थाची संख्या ६५० पेक्षा जास्त असून त्यापैकी १३१ महिला संस्था संघाच्या सभासद संस्था आहेत.
संघाच्या ठेवीत लक्षणीय वाढ
जिल्हा दूध संघावर दूध उत्पादक संस्था आणि शेतकरी सभासदांचा विश्वास दिवसेंदिवस दृढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज संघाकडे 37 कोटींच्या ठेवी जमा आहेत. प्रशासकीय काळाशी तुलना करता ठेवीची रक्कम दुप्पट आहे, ही किमया व विश्वास गेल्या सहा वर्षातील सचोटीच्या कामाची पावतीच म्हणता येईल. सध्याची स्थिती पहाता संघाची वाटचाल आत्मनिर्भरतेच्या दिशेने सुरू असल्याचे म्हणता येईल. अशा संस्थेवर चौकशा बसवून कोणते सार्वजनिक हित साधले जाणार आहे, याचं उत्तर सुडाने पेटलेल्याना यथावकाश जनतेला द्याव लागेल.
….सुरेश उज्जैनवाल, ज्येष्ठ पत्रकार जळगाव