
अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरात ३१ जुलै रोजी आलेल्या पुरामुळे पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे मोजकेच पाईप वाहून गेले असताना, ते तात्पुरते जोडून नागरिकांना दिलासा देणे शक्य होते. मात्र, दुरुस्तीचे काम लांबवून अमळनेरकरांना मूलभूत पाणीपुरवठ्यापासून वंचित ठेवण्यात आले, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र (जितू) ठाकूर यांनी केला आहे.
येत्या दोन ते चार दिवसांत अमळनेर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पालिकेवर थेट जनमोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
अमळनेर शहरातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. २७-२८ जुलैनंतर शहरातील पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला असून, अनेक भागांत नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा थेंबही मिळालेला नसल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे.
‘युद्धपातळीवर काम’ म्हणता, मग १०० मजूर का नाही ?
पालिका प्रशासनाकडून सोशल मीडियावर काम सुरू असल्याचे फोटो, व्हिडिओ आणि रील्स प्रसिद्ध केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात कामाचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही, असा आरोप ठाकूर यांनी केला. “खरोखरच युद्धपातळीवर काम करायचे होते, तर २५-३० मजुरांऐवजी १०० मजूर लावून दिवस-रात्र काम करून पाईपलाईन आठ-दहा दिवसांत का जोडली नाही? नागरिकांच्या मूलभूत गरजेपेक्षा कामाचा वेग वाढविण्याला प्राधान्य का दिले गेले नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पाणीवाटपात पक्षपाताचा आरोप
बायपास लाईनवरून सुरू असलेल्या पाणीवाटपावरही ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही भागांत दररोज काही मिनिटे पाणी मिळत असताना, शहरातील अनेक भागांतील नागरिकांना गेल्या १५-२० दिवसांत पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला. “काही भागांना नियमित पाणी आणि बहुतांश नागरिकांना प्रतीक्षा, असा भेदभाव का? अमळनेरमधील प्रत्येक नागरिकाला समान पाणीपुरवठ्याचा अधिकार आहे,” असे ठाकूर यांनी म्हटले.
पालिकेने टँकरद्वारे मोफत पाणी का दिले नाही?
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पालिकेने टँकरद्वारे मोफत पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक होते, असे ठाकूर यांनी म्हटले आहे. पालिकेच्या अपयशामुळे ‘जयनील फाउंडेशन’ सारख्या संस्थांना स्वतःच्या खर्चाने टँकरद्वारे नागरिकांची तहान भागवावी लागत आहे, याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले.
‘पाणी मिळेपर्यंत पाणीपट्टीबाबत जाब विचारा’
दरवर्षी नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल केली जाते; मात्र हक्काचे पाणी देण्यात पालिका अपयशी ठरत असेल तर नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारला पाहिजे, असे आवाहन ठाकूर यांनी केले. “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाणीपट्टी वसुलीसाठी येणाऱ्या पालिकेच्या पथकाला आधी नागरिकांना पाणी का मिळत नाही, याचा जाब विचारावा,” असे त्यांनी म्हटले.
‘राजकारण नाही, जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष’
“पाण्याच्या प्रश्नावर आम्ही कोणतेही राजकारण करत नाही. विरोधकही या कामात सहकार्य करत आहेत. अमळनेरची जनता संयमी आहे; मात्र तिच्या संयमाचा अंत पाहू नये. नागरिकांचे सातत्याने फोन येत असल्याने हा जाब विचारावा लागत आहे,” असे ठाकूर यांनी स्पष्ट केले. येत्या दोन ते चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन पालिकेवर जनमोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दुरुस्तीचे श्रेय घेण्यासाठी फोटोसेशन होणार ?
पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका प्रशासनाकडून उद्घाटन, फोटोसेशन आणि सोशल मीडिया प्रसिद्धीचा धडाका सुरू होण्याची शक्यता असल्याची टीकाही ठाकूर यांनी केली. “जनतेला पाणी हवे आहे, उद्घाटनाचा सोहळा नाही. नागरिकांची तहान भागवणे ही पालिकेची जबाबदारी आहे; त्यासाठी फोटोसेशन करून उपकार केल्याचा आव आणण्याची गरज नाही. आधी पाणी द्या, नंतर श्रेय घ्या,” असा टोला ठाकूर यांनी लगावला. आता अमळनेरकरांचा संयम संपत चालला असून, दोन ते चार दिवसांत पाणीप्रश्न मार्गी न लागल्यास पालिकेविरोधात जनआंदोलन उभारले जाणार असल्याने प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.











