जळगाव (प्रतिनिधी) गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे संकट आले. शासनाने कोरोनामुक्त गावाला बक्षीस द्यायचे जाहीर केले. पण आम्ही स्पर्धेत उतरलो नाही. कारण चळवळ होणे गरजेचे आहे. लोकांच्या मनातील भिती दुर करणे आवश्यक आहे. कोरोनासारखे अनेक संकटे येतील, पण संकटांना सामोरे जाणारी व्यवस्था निर्माण करावी असे आवाहन आदर्श हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी येथे आयोजीत सरपंच परिषदेत केले. दरम्यान गावे स्वावलंबी करतांना त्यात राजकारण येऊ देऊ नका असा कानमंत्रही त्यांनी दिला.
शहरातील यश लॉन येथे जिल्हा सरपंच मेळावा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्ह्यातील सरपंचांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पद्मश्री पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन करतांना पुढे सांगितले की, देशातील सर्व प्रकारच्या निवडणुका ह्या पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जातात, पण ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षविरहीत आणि स्थानिक प्रश्नांवर लढविली जाते. कारण राजकारण येता कामा नये. म्हणून एकदा निवडुन आले की गावाचे व्हा. अडचणी अनेक आहेत, त्या अडचणींना सामोरे जा. जिवनात खेळ महत्वाचा आहे. जिंकलं तर हवेत जायचं नाही आणि हरले तर डिप्रेशनमध्ये जायचं नाही. खेळातून टिमवर्क शिकता आलं. स्व. दादासाहेब रूपवते यांच्या भाषणाचा मोठा प्रभाव राहीला. पहिलं सोशल इंजिनीअरींग १९८२ साली आमचे मेव्हणे जगन्नाथ पाटलांनी नगरमध्ये केले. स्वावलंबन काय असते हे कर्मवीरांच्या शिकवणीतून शिकलो. महापुरूषांच्या केवळ जयंत्या आणि पुण्यतीथ्या करू नका यांना जीवनात प्रत्यक्ष कृतीत आणा. आम्ही हिवरेबाजारमध्ये एकही पुतळा उभा केला नाही. माणसं एकत्र आली तर बदल नक्कीच घडु शकतो. ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांच्यासाठी सरकारी व्यवस्था आहे. पक्ष बाजुला ठेऊन संस्काराच्या गोष्टी स्विकारल्या पाहिजे. हिवरेबाजारमध्ये मी वैयक्तीक काही केले नाही. पण ज्या सरकारी व्यवस्था होत्या त्याच सक्षम केल्या. सरकारी माणसांना आपण दिशा कशी देतो यावर आपल्या गावाची प्रगती अवलंबून असते असेही पवार यांनी सांगितले.
पंजाबमध्ये घराघरात व्यसने
पद्मश्री पोपटराव पवार यांनी पुढे बोलतांना सांगितले की, समृध्दी आली की व्यसने येतात. ज्या पंजाबने देशाचे पोट भरले आज त्याच पंजाबमध्ये घराघरात व्यसने आली. समृध्दीच्या मागे व्यसने येतात. पीकांवर पाणी आणि खतांचा एवढा भडीमार केला की, घराघरात कॅन्सरचे आजार झाले. पंजाबमध्ये मातीचे आरोग्य संपले. देशात सर्वात मोठे आव्हान हे मातीचे आहे. वाहुन चाललेल्या मातीकडे लक्ष द्या. पर्जन्यमान कमी झाले आहे. म्हणून माती आणि पाणी यासाठी मोठं काम करण्याची गरज आहे. जे प्रश्न संपले नाही ते सोडविण्यासाठी समन्वयाची गरज आहे. मागण्या करतांना तिजोरी आणि सरकारी व्यवस्था लक्षात घ्या. आता एकच जीआर काढुन चालणार नाही. ७५ वर्ष झाले आता काही बदलाची गरज आहे. शौचालयाचा एकच जीआर निघाला. खडकावरच्या गावाला १२ हजार आणि काळ्या मातीच्याही गावाला १२ हजार असे चालणार नाही. त्यामुळे वातावरणाचे परिणाम लक्षात घेतले पाहीजे. एक नक्षलवाद आता धरणाच्या बांधावरही निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकप्रतिनीधी आणि सरपंच यांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. निव्वळ चेकवर सही करण्याचे काम करू नका. गावं स्वावलंबी करतांना राजकारण येऊ देऊ नका असा कानमंत्रही पद्मश्री पोपटराव पवार यांनी सरपंचांना दिला.
यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच परिषदेत पद्मश्री पोपटराव पवार यांचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी खा. रक्षा खडसे, खा. उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, आमदार शिरीश चौधरी, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश सरचिटणीस अॅड. विकास जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.