मुंबई (वृत्तसंस्था) ईडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं. हातातल्या बाहुलीप्रमाणे ईडीला नाचवलं जात आहे. स्वतंत्रपूर्व काळातदेखील इतका अतिरेक झाला नाही. त्यामुळे ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी ? अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोदींवर टीका केली आहे.
हल्लीच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली. यावर बच्चू कडू यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. बच्चू कडू यांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र डागलं आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी गंगास्नान करून आले आहेत का? त्यांच्यावर कारवाई का नाही? असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘ईडीचे ऑफिस आता मोदींच्या घरून चालतं आहे. ते पंतप्रधान कार्यालयातून चालत नाही असं दिसतं. गैरफायदा घेणारं हे पहिलं सरकार आहे. हातातल्या बाहुलीप्रमाणे इडीला नाचवलं जात आहे.’ यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी भाजप नेत्यांसह ईडीवरही टीका केली आहे. ‘ईडीच्या प्रमुखांना काही इमानी इभ्रत काही जिवंत असेल आणि भारताचे नागरिक असाल तर त्यांनी सांगा की ते मोदीचे गुलाम आहेत की भारतीय घटनेचे अधिकारी आहेत? एका तरी भाजपच्या नेत्यावर, आमदारांवर चौकशी झाली असेल असे एखादे उदाहरण सापडलं नाही. हे सर्व गंगास्नान करून आलेत का? याच्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळामध्येदेखील इतका अतिरेक झाला नाही याचा दुष्परिणाम सरकारला भोगावा लागेल’ असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.