मुंबई (वृत्तसंस्था) ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांना लक्ष्य केले आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी राजकीय विरोधकांवर सरकारी तपास यंत्रणा वापरल्या जात असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सत्ता पुन्हा मिळणार नाही म्हणून ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे. “महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी केला. लोकांची बांधिलकी ठेवण्याचे काम सरकार करत असून राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्यासोबत घेत काम करत आहे,” असंही शरद पवार यांनी म्हटलं. राज्यात आज जे सरकार आहे त्याला सर्वसामान्यांचा पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले.
शरद पवारांना यावेळी रावसाहेब दानवे यांनी तीन महिन्यात भाजपाचं सरकार येणार असल्याच्या दावा केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे माहिती नव्हतं असा टोला त्यांनी लगावला. “रावसाहेब दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहे. पण त्यांचा हा गुण मला माहित नव्हता. राजकारणात कधीही त्यांना ‘ज्योतिषी’ म्हणून ओळख मिळालेली नाही, पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आज कळालं,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.