मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेतून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मोबाईलवरुन तब्बल तीन वेळेस संपर्क साधला आहे. त्यामुळे शिंदेचा गट मनसेत विलीन होणार ?, या चर्चला उधान आले आहे.
राज ठाकरे यांच्या हिप बोनची शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. ते दोन दिवसांपूर्वीच हॉस्पिटलमधून घरी परतले आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ फोनवर चर्चा झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठा झटका दिला आहे.
शिंदे यांनी ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रातील अलीकडील राजकीय परिस्थितीबद्दल बोलून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तर एकनाथ शिंदे यांच्या सोबत दोन तृतीयांश आमदारांचा गट जरी असला, तरी त्या गटाला अन्य कुठल्या तरी पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीय. अशातच बंडखोरांचा गट राज ठाकरे यांच्या मनसे मध्ये प्रवेश करू शकेल का?, शिंदे गट धोक्यात असल्याने त्यांच्या मदतीला राज ठाकरे जाणार का? यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ठाकरे नाव वगळून आणि शिवसेना वगळून जगून दाखवा, असे आव्हान दिले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव निदान पोस्टरवर तरी सोडले आहे. पण ठाकरे हे नाव केवळ उद्धव ठाकरे यांची मक्तेदारी नाही तर राज हे देखील ठाकरेच आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे मनसे विलनीकरणाचा मार्ग स्वीकारू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.