मुंबई (वृत्तसंथा) राज्यातील सत्तासंघर्षाच्या चढाओढीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एक जुने भाषण व्हायरल होत आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये निवडणुकीत मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते. त्यावेळी राज यांनी काही न बोलता ‘वेळ प्रत्येकावर येते’ असं विधान केले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज ठाकरेंचे ते भाषण पुन्हा व्हायरल होऊ लागले आहे.
या भाषणात राज ठाकरे म्हणाले होते की, ‘मी शिवसेनेतून ज्या वेळेला बाहेर पडलो, त्यावेळी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. हे उद्धव वगैरे आहेत ना, त्यांच्या या नीच राजकारणाचा मला कंटाळा आला होता. म्हणून मी बाहेर पडलो. मला पक्ष फोडून माझा पक्ष उभारायचा नाही. या गोष्टी मला करायच्या नाहीत, मी करणारही नाही. पक्ष स्थापनेच्या वेळीही, कोणालाही विचारुन बघा, मी एकालाही फोनही केला नव्हता.
आजपर्यंत या लोकांना मी अनेक वेळा मदत केली, पण हे असलं राजकारण बाळासाहेबांनी कधी शिकवलं नाही. बाळासाहेब जसे वागायचे, त्यांनी जे शिकवलं ते मी आत्मसात केलं आहे, उद्धव आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून अत्यंत नीच अशी खेळी खेळली गेली. असेही राज ठाकरे म्हणाले होते. शिवसेनेवर आज जी वेळ आलीय त्यावरून सोशल मीडियात राज ठाकरेंचा जून्या भाषणाचा व्हिडिओ चांगलच व्हायरल होत आहे.