जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आकाश वाणी चौकाकडून महाबळकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सागर पार्क ते महाबळ रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले.
जळगाव शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. शहरात कोणत्याही रस्त्यावर गेले असता रस्त्यांच्या दोन्ही बाजूला, विविध वस्तू विक्रेते, भाजीपाला विक्रेते व खाद्यपदार्थ्यांचे स्टॉल लावणाऱ्या पथविक्रेत्यांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सागर पार्क ते महाबळ रस्त्यावरील पाच हातगाड्या, पाच तराजू काटे, १५ खुर्चा, आठ टेबल व दोन ट्रॅक्टर भाजीपाला जप्त करण्यात आला होता. या रस्त्यावरील सर्व नाश्त्याच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्यामुळे हा रस्ता रहदारीसाठी सुरळीत झाला होता. तसेच गेल्या चार ते पाच दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहासमोरील भाजी विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यात येत असल्यामुळे नाट्यगृहाचा रस्ता देखील अतिक्रमण मुक्त झाला आहे.